मुंबई : आज सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने जेलभरो’ आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या जेलभरो आंदोलन म्हणजे मराठा मोर्च्याने आंदोलनाला दिलेली पुढची दिशा असेल असं सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले. त्या निमित्ताने सकल मराठा मोर्चा त्याच्या सर्व मागण्या पुढे करणार आहे. यादी झालेल्या आदोलनात मुंबई तसेच ठाण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून मुंबईसह ठाणे व इतर ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.

तसेच मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटल यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी, तसेच मराठा समाजासाठी ज्यांनी प्राण गमावले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला सरकारने ५० लाख रुपये व जखमींना १० लाख रुपये देण्यात यावेत. तसेच आंदोलनादरम्यान कळंबोली येथे महिलांवर केलेल्या बेछुट लाठीचार्ज व गोळीबार संदर्भात सदर पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना सेवेतून त्वरीत निलंबित करण्यात यावे अशी दुसरी मागण्या जेलभरो आंदोलनामार्फत करण्यात येत आहे.

Today maratha morcha have organised jail bharo andolan