मुंबई : शिवसेना आमदारावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री फडणवीसांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सध्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचे सुद्धा अधोरेखित केले आहे. राज्यातील पोलिसांना पक्ष कार्यकर्त्याचा दर्जा तर पक्षातील वाल्यांना कायदा-सुव्यवस्थेचे रखवालदार बनवले गेले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रोच्या कामाला विरोध करणाऱ्या शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर २ दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्याची गंभीर दखल शिवसेना पक्ष प्रमुखांनी घेतली आहे.

त्यामुळे ढासळत्या कायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरण्यात येत आहे. तसेच ढासळलेल्या परिस्थितीवर शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखात्यावर अकार्यक्षम म्हणून ठपका ठेवला आहे. शहरात पोलिसांचा दरारा व कायद्याचा धाक असल्यामुळेच मुंबई आतापर्यंत सुरक्षित राहिली होती. परंतु मागील २-४ वर्षांत मुंबईची अधिक वाट लागली आहे. सर्वच बाजूने मुंबईवर जे अधिकारी लादले गेले ते फक्त ओरबडण्यासाठी व शहराची वाट लावण्यासाठीच आहेत असा वार सामनातून करण्यात आला आहे.

पंतप्रधानांच्या जिवास धोका असल्याची गुप्त वार्ता आपल्या पोलिसांना लगेच समजते, इतकेच नाही तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे ‘बॉम्ब’ ठेवल्याची माहिती सुद्धा झटपट मिळते, पण आमदारावर हल्ले होणार आहेत किंवा रस्त्यावर कुणाला गोळ्या घातल्या जाणार आहेत हे पोलिसांना कसे कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. मुंबई शहरात सध्या ‘मेट्रो’ची मोठ्याप्रमाणावर कामे काढली आहेत. दरम्यान, त्यासाठी सर्व ठेकेदार नागपुरातूनच मागवले आहेत असा अनेकांनी दावा केला आहे अशी खरमरीत टीका करण्यात आली आहे.

Udhav Thackeray criticised Fadanvis over disturbed law and order in the state after attacked on shiv sena mla