अमरोहा : भाजपच्या नेत्यांना आणि पक्षाला उत्तर प्रदेशातील धनौरा तालुक्यातील रसूलपूरच्या गावकऱ्यांनी गावाच्या सीमेवर थेट फलक लावून भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे. शिवाय गावात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते फिरकू नये म्हणून पहारा सुद्धा देण्यात येत आहे. “जर आमच्या गावात भाजप नेते मतं मागण्यासाठी आले, तर ज्याप्रकारे दिल्लीच्या सीमेवर आम्हा शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला, त्याचप्रकारे भाजप नेत्यांचं आमच्या गावात स्वागत केले जाईल” अशा कडक शब्दात हा इशारा देण्यात आला आहे.
जर भाजपचे नेते मंडळी आमच्या गावात आले तर स्वतःच्या जीवाचं रक्षण त्यांनी स्वतःच करावं असा दम त्यांना या फलकाद्वारे देण्यात आला आहे. या गावात जवळपास १००० मतदार आहेत आणि आमच्या गावातून भाजपला आगामी निवडणुत एकही मत दिलं जाणार नाही असा निर्धार या गावातील लोकांनी केला आहे. शेतकऱ्यांवरील लाठी हल्ल्यानंतर भाजप विरोधात या गावात खूप रोष पसरला आहे आणि तो इतर आसपासच्या गावात सुद्धा पसरण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे.
हा फलक समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्याने आसपासच्या गावातील लोकं सुद्धा तिथे जमू लागल्याचे चित्र सध्या गावात आहे. त्यामुळे तो भाजपविरोधी तिरस्कार सजून आसपासच्या गावात पसरण्याची शक्यता आहे. एकूणच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला दिल्लीच्या सीमेवर अडवून, त्यांच्यावर प्रचंड लाठीहल्ला करण्यात आला होता आणि त्यामुळेच उत्तर भारतात भाजप प्रति रोष पसरू लागला आहे.
