हिंगोली : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ते दुष्काळग्रस्त भागांना भेटी देत आहेत. काल नांदेडपासून सुरु झालेला त्यांचा दौरा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील साळवा गावाला भेट देण्यापर्यंत झाला.
दरम्यान, पूर्वनियोजित वेळेनुसार हा दौरा ३ तासाने म्हणजे १ वाजता होता, पण आदित्य ठाकरे नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहोचल्याने ४ वाजता सुरु झाला. तो पर्यंत स्थानिक शेतकरी बराचवेळ त्यांची वाट पाहत ताटकळत बसले होते. दरम्यान, पोहोचल्यावर त्यांनी काही वेळाने उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी बाजूलाच ठेवलेल्या कापसाला पाहून ‘कापूस फार सुकून गेला आहे’ असं त्यांनी शेतकऱ्यांना विचारले. त्यावर उपस्थित शेतकरी काही क्षण अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागले आणि हळूच हसले सुद्धा.
विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचा हा दौरा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि स्थानिक शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यासाठी आखण्यात आला होता. परंतु, कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांच्या भेटी त्यांनी केवळ १० मिनिटात आटपल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाल्याचे पाहायला मिळाले.
