मुंबई : कॅप्टन अमोल यादवच्या स्वदेशी विमान निर्मिती कारखान्यासाठी राज्य सरकार पालघरमध्ये जागा उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र सरकार त्यासाठी पालघर एमआयडीसी मार्फत विमान निर्मिती कारखान्यासाठी जागा उपलब्ध करून करून देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र सरकार आणि अमोल यादव यांच्यात ३५,००० हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे.
अमोल यादवची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. द्विपक्षीय करारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते. आता प्रतीक्षा आहे ती या कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन अमोल यादवला प्रत्यक्ष जमिनीचा ताबा कधी मिळतो त्याची.
विशेष म्हणजे हा भारतातील पहिलाच स्वदेशी विमान निर्मितीचा कारखाना असेल आणि तो महाराष्ट्रात सुरु होणार आहे. २० नोव्हेंबर रोजीच डीजीसीएने अमोल यादवांच्या विमानाची नोंदणी करून घेतली होती आणि तसे पत्र स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले होते.
प्रचंड अडचणींचा सामना करणाऱ्या अमोल यादवने अशी ही खंत व्यक्त केली होती की अशा प्रकारची नोंदणी अमेरिकेत केवळ एका महिन्याच्या आतच झाली असती परंतु तिथे नोंदणी झाल्याने त्याच्या वरील ‘स्वदेशी’ हा शिक्का पुसला गेला असता आणि त्यासाठीच अमोल यादवने तब्बल ६ वर्ष प्रतीक्षा केली आणि अखेर त्या प्रतिक्षेला यश आलं आहे.
