मुंबई : पनवेलमध्ये घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बांगलादेशींना खळ खट्याकचा इशारा देण्यात आला आहे. ‘बांगलादेशीनो चालते व्हा’, असे सांगणारे पोस्टर पनवेलमध्ये पाहायला मिळत आहेत. ९ फेब्रुवारीला बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आझाद मैदान इथे मोर्चा होणार आहे. या पार्श्वभुमीवर पनवेल परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांगलादेशींना जाहीर आव्हान दिले आहे.
बनावट डॉक्युमेंट बनवून पनवेल आणि परिसरात बांगलादेशी राहत आहेत हे वारंवार समोर आले आहे. एका मराठी कुटूंबाला फसवून बांगलादेशी चक्क त्या कुटूंबात जावई झाला. मनसे हे कदापी सहन करणार नसल्याचे मनसे पदाधिकारी महेश जाधव यांनी सांगितले. तसेच पोलीस आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने पडताळणी करावी आणि या बांगलादेशींची हकालपट्टी करावी नाहीतर आम्हाला खळ खट्याक शिवाय पर्याय नसल्याचेही जाधव म्हणाले.
नवी मुंबई, पनवेल परिसरात स्वस्तात मजूर मिळतायत म्हणून अनेक ठेकेदार या बांगलादेशींची राहण्याची सोय करतात. त्यांना आश्रय देतातय. हे आमच्या लक्षात आल आहे. आमचा त्या ठेकेदारांना आणि जो कोणी बांगलादेशिना आश्रय देतोय त्या सगळ्यांना इशारा आहे तात्काळ हे थांबवा नाहीतर आम्ही आमच्या स्टाइलने धडा शिकवू असा इशारा मनसे पदाधिकारी सुधीर नवले यांनी दिला आहे.
तत्पूर्वी, मुंबई पुण्यात पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधात उघडपणे बॅनरबाजी होताना दिसत होती. मनसेच्या भगव्याने कट्टर भूमिका घेतली असली तरी युतीच्या काळात उघड भूमिका मांडणारी शिवसेना महाविकास आघाडीमुळे अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा अभूतपूर्व असेल अशी माध्यमांमध्ये देखील चर्चा असून, त्यानंतर राज ठाकरे यांची हिंदुत्वाबद्दलची भूमिका देशभर बळकट होऊन मनसेबद्दल भविष्यातील वेगळी विचारधारणा निर्माण होण्याची अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
दुसऱ्या बाजूला, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळं देशातील कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही. मात्र, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. एनआरसी लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूपच अडचणी येऊ शकतात. मी असं होऊ देणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.
Web Title: MNS Panvel activists gone aggressive with advertisement against intruder Bangladeshi.
