पालघर: जनतेने आम्हाला जनमत दिलं होतं, परंतु शिवसेनेने बेईमानी केली अशी टीका माजी मुख्यमंंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं असाही टोला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी लगावला. एवढंच नाही तर ठाकरे सरकारवरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीची घोषणा देणार होती परंतु ते आश्वासन ठाकरे सरकारनं पाळलं नाही अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पालघर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारवर त्यांनी यावेळी जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘जनतेनं युतीला जनमत दिलं होतं, परंतु शिवसेनेनं बेईमानी केली. सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का?, असा सवाल फडणवीस यांनी केला. ‘वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं,’ असंही ते म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर घणाघाती टीका केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, सातबारा कोरा करू अशी आश्वासने जनतेला देण्यात आली होती. परंतु त्यातील कशाचीही पूर्तता झालेली नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ जनादेशाशीच नव्हे तर जनतेशीही प्रतारणा केली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

Web Title:  Opposition Leader Devendra Fadnavis again Target Shivsena over MahaVikas Aghadi Govt Formation in Maharashtra.

फडणवीसांचा जनमतावरून सेनेवर पुन्हा हल्लाबोल; अजून धक्क्यातून सावरले नसल्याची चर्चा