मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपले इनकमिंग सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून विजयी होऊ शकणाऱ्यांना शिवबंधन बांधण्याचे काम वेगात आले असून येत्या आठवड्यात बार्शीचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल आणि बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले आहे.

मात्र शिवसेनेच्या बाबतीत विषय केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसपुरता मर्यादित नसून भाजपच्या कचाट्यातून शिल्लक असलेले इतर पक्ष शिवसेनेचे लक्ष झाले आहेत. एकाबाजूला भाजपने काहीच न बोलता सदाभाऊ खोत, महादेव जाणकार, रामदास आठवले आणि विनायक मेटे यांचे पक्ष काहीच न बोलता अप्रत्यक्षरित्या भाजपात विलीन केले आहेत आणि शिवसेना वगळता भाजपचे सर्वच सहकारी पक्ष जवळपास भाजपात न बोलता विलीन झाले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील मोठ्याप्रमाणावर पक्षविस्तार करत आहे.

त्यात पालघर, विरार, वसई आणि नालासोपारा पट्यात मोठी ताकद असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या मुळावर घाव घालण्याची योजना शिवसेना सध्या आखात आहे. लोकसभा निवडणुकीत पालघरच्या जागेवर विजय प्राप्त केल्यावर शिवसेनेचा आत्मविश्वास अजुन दुणावला आहे. सध्या बहुजन विकास आघाडीकडे याच पट्ट्यात एकूण ३ आमदार आहेत आणि महत्वाच्या महानगपालिका आणि नगरपालिका हातात आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर आणि मुलगा क्षितिज ठाकूर दोन सदस्य तर घरातीलच असून इथेही घराणेशाहीमुळे अंतर्गत नाराजांची फौज सध्या शिवसेनेच्या रडारवर आहे.

बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले आहे. विलास तरे हे बहुजन विकास आघाडीकडून निवडून आले आहेत. त्यांना २०१४ साली टक्कर देणारे कमलाकर वळवी हे आता शिवसेनेत आहेत. त्यावेळी त्यांना दोन नंबरची मते मिळाली होती. शिवाय तेव्हा भाजपमध्ये असणारे जगदीश धुडी हे आता शिवसेनेत असून ते ही इच्छुक आहेत. या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सेनेला सोपा आहे. म्हणून तरे शिवबंधन बांधण्यास तयार झाले आहेत. दहीहंडीच्या दिवशी ते शिवसेनेच्या कार्यक्रमातही जाऊन आले.

दुसरीकडे प्रत्यक्ष क्षितीज ठाकूर यांना देखील या निवडणुकीत पाडण्याची व्यूहरचना आखली जात आहे असं वृत्त आहे. पालघर पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिलेला असताना शिवसेना उमेदवाराला अडीज लाखाच्या घरात मतं पडली होती आणि तेव्हाच सेनेचा विश्वास या पट्ट्यात दुणावला होता. एकाधिकार शाहीने भरडली गेलेली ही शहरं आणि तिथला मोठ्या प्रमाणावर नाराज असलेला मतदार सेनेला मतदान करू शकतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक स्वतः आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासाठी देखील अस्तित्वाची लढाई असेल असं राजकीय विश्लेषक मानतात. त्यात शिट्टी हे मूळ निवडणूक चिन्ह गमावल्याने सर्वच कठीण होण्याची शक्यता सुनावली आहे.

 

विधानसभा: शिवसेनेच्या योजना बहुजन विकास आघाडीच्या मुळावर? सविस्तर