पालघर : मुंबईकरांना पहिले काही दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने मुंबईमध्ये जरी थोडी उसंत घेतली असली तरी पावसाने आता मोर्चा मुंबई नजीकच्या शहरांकडे वळवल्याचे दिसत आहे. ठाणे, पालघर जिह्यातील तानसा आणि वैतरणा ही दोन्ही मुख्य धरणे ओसंडून वाहू लागली असून आता कधीही पुराचा धोका संभवतो असे सूतोवाच प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे नद्यांनी देखील धोक्याची पातळी गाठली असून कोणत्याही क्षणी पूर येऊन परिसरातील तब्बल ७५ गावांची घर देखील पाण्याखाली बुडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान धोक्याचा सायरन मुंबई महापालिकेने वाजवला असून तातडीने ठाणे, पालघरवासीयांना ‘जागते रहो’चा थेट इशारा दिला आहे. वैतरणा नदीवरील शहापूर तालुक्यात खर्डी गावाजवळ मोडकसागर धरणाच्या पाण्याची पातळी आज १६०.८४२ मी. टीएचडी इतकी मोजली गेली आहे. धरण ओसंडून वाहण्याची पातळी १६३.१४९ मी. टीएचडी असल्याने आणि परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता लवकरच मोडकसागर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शहापूर तालुक्यातील तानसा गावाजवळील तानसा धरणात पाणीसाठा १२६.७८१ मी. टीएचडी झाला असून १२८.६२ मी. टीएचडीपर्यंत पातळी गाठताच हे धरणही ओसंडून वाहण्याच्या तयारीत आहे.

तानसा व वैतरणा या दोन्ही धरणांनी व नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असल्याने ठाणे व पालघर जिह्यातील तब्बल ७५ गावांना पुराचा धोका आहे. यामध्ये वैतरणा नदी परिसरातील ४२ गावे तर तानसा नदी परिसरातील ३३ गावांचा समावेश आहे. या गावांच्या यादीसह मुंबई महापालिकेने ठाणे, पालघर जिल्हाधिकाऱ्यांसह भिवंडी, शहापूर, वाडय़ाचे तहसीलदार तसेज आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. कैतरणा आणि तानसा धरणाखालील आणि नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना पुराची कल्पना देऊन सावध राहण्याचे निर्देश द्यावेत असे पत्र पालिकेचे कार्यकारी अभियंता र. श. जोहरे यांनी संबंधित यंत्रणांना पाठकले आहे.

पालघर: पुराचा धोका! मुंबई पालिकेने धोक्याचा सायरन वाजवला; पालघरवासीयांना ‘जागते रहो’