मुंबई : काल पुण्यात झालेल्या एका मुलाखती दरम्यान राज ठाकरेंच्या वेगळ्या विदर्भासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, विदर्भात राहणाऱ्या मराठी माणसाला स्वतंत्र विदर्भ व्हावा असे अजिबात वाटत नाही. त्यावर विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी एक निवेदन काढत संताप व्यक्त केला आहे.
त्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी ही भाषावादावर आधारित नाही. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचा थेट विकासाशी संबंध आहे. आतापर्यंत महाराष्ट्राचा एकही ‘मराठी भाषिक’ मुख्यमंत्री हा विदर्भाचा विकास करू शकलेला नाही आणि त्यामुळेच वेगळे विदर्भ राज्य हवे आहे असे त्या निवेदनात श्रीहरी अणे यांनी म्हटले आहे.
वेगळ्या विदर्भासंदर्भात मराठी हिंदी भाषिकांच्या वर्चस्वाचा वाद हा निव्वळ खोडसाळपणा असून त्याद्वारे केवळ गैरप्रसार करणारा आहे. विदर्भात सर्वच भाषेचे लोक राहतात आणि आम्ही याला आमची समृद्धी समजतो, न्यूनता नव्हे. विदर्भ हे वेगळं राज्य झालं तर त्याचा मुख्यमंत्री हा हिंदी भाषिक असेल की मराठी भाषिक ही भीती फक्त विदर्भाचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना वाटत असेल असं ही श्रीहरी अणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
