मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी संध्याकाळी एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईकडे रवाना झाल्याने प्रसार माध्यमांमध्ये पुन्हा चर्चेचा विषय झाला. मात्र तो निव्वळ योगायोग असल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे त्यांचा १० दिवसांचा पश्चिम विदर्भाचा दौरा आटपून काल औरंगाबादमार्गे मुंबईला विमानाने रवाना झाले.
वास्तविक राज ठाकरेंच्या पूर्व नियोजित दौऱ्याप्रमाणे ते औरंगाबाद मार्गे विमानाने मुंबईला परततील हे १० दिवसांपूर्वीच निश्चित करण्यात आलं होत. त्यांनी अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा दौरा केला. या दौर्यात त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तसेच सामान्य माणसात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अर्थात हा दौरा अपेक्षेहून अधिक यशस्वी झाला असं एकूण चित्र आहे. तोहा पूर्वनियोजित दौरा गुरुवारी आटोपला आणि ते औरंगाबादमार्गे विमानाने मुंबईकडे येण्यासाठी निघाले होते.
परंतु, योगायोगाने राष्ट्रवादीचे शरद पवार यांची औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद होती ती आटोपून ते सुद्धा मुंबईकडे विमानाने रवाना झाले. मात्र ते दोघे एकाच विमानातून मुंबईकडे येत असल्याचे वृत्त पसरल्याने त्याची प्रसार माध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली होती. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून भाजपविरोधात महा आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या आघाडीत मनसेला सहभागी करून घ्यावे यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याची बोलवा आहे.
मनसे पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी राज यांचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नाशिक विभागात मनसेची आजही मोठी ताकद असल्याचे विरोधकांना माहित आहे. दरम्यान, मनसे अध्यक्षांना मिळणार प्रतिसाद हा इतर कोणत्याही विरोधकांपेक्षा मोठा आहे हे नाकारता येत नाही. त्यामुळे राज आणि पवार यांच्या जवळिकीकडे कुतूहलाने पाहिले जात आहे.
