बारामती : राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याची अजून एक नवी समोर येत आहे. होय! एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार आता सामनातील टीकेला उत्तर देण्यासाठी आणि काकाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार हे राजकारणातील टाकाऊ माल आहेत, अशी हलक्या भाषेतील टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंना रोखठोक प्रतिउत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की,’बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा ! त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा. बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. मार्मिक असो कि सामना त्यांनी टिका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला’.
उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतलं नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत. इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता. बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा! त्या ‘सांभाळा’चा अर्थ काल समजला. आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या, असंच त्यांना म्हणायचं असेल, अशी चपराक रोहितनं लगावली आहे.
