चंद्रपूर : आधीच देशभरात वाघांची संख्या झपाट्याने घटत आहे आणि त्यात अशा घटनांनी असलेले वाघ तसेच इतर प्राणी सुद्धा रोज प्राण गमावत आहेत. काही दिवसांपूर्वी अवनी वाघिणीला नरभक्षक घोषित करून विशेष मोहीम राबविण्यात आली आणि ठार करण्यात आले. परंतु मनुष्य प्राणी त्यांच्या अस्तित्वावर घाला घालत आहे यावर पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे.
चंद्रपूरमध्ये बल्लारपूर एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत वाघांच्या २ बछड्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे २ बछडे ८ ते १० महिन्याचे असल्याचं सूत्रांनी सांगितलं. चंद्रपूरच्या जुनोना जंगल परिसरात ही घटना घडली असल्याचे वृत्त आहे. जंगलपरिसरातील रेल्वे रूळ ओलांडताना बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरखाली या २ बछड्यांचा मृत्यू झाला. आज पहाटे सात वाजता ही घटना घडल्याचे समजते. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने जंगलपरिसरातूनच रेल्वे रूळ टाकल्याने अनेक दुर्मिळ प्राणी रोजच्या रोज प्राण गमावत आहेत. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपस सुरु केला आहे.
