औरंगाबाद : शिवसेनेचे नेते कुठे सुद्धा डोकं लावतात असं खिल्ली उडवणारे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्याला निमित्त आहे ते राज्य सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली, असे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी दुपारी सुपूर्द केले. राज्यातील बळीराजाचे कर्ज माफ करावे आणि राज्य सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन केवळ जाहिरातबाजी केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची केवळ क्रूर चेष्टा चालवली आहे. अशा कडक शब्दांमध्ये ते निवेदन देण्यात आल्याने, रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेत्यांवर ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसार माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील ४१ लाख शेतकर्‍यांना आतापर्यंत २४, २५० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीयकृत बँका यांनी कर्जमाफीसाठी पात्र ठरवलेले ते सर्व शेतकरी आहेत. त्यामुळे राज्य सरकार सामान्य जनतेची कोणतीही दिशाभूल करंत नाही. आता केवळ दहा टक्के पात्र शेतकरी शिल्लक राहिले आहेत. त्यांची सुद्धा कर्जमाफी लवकरच करण्यात येईल.

त्यामुळे विरोधकांनी कोणताही अभ्यास आणि अर्धवट माहितीच्या आधारे अर्जफाटे करुन, जनतेसाठी आम्ही काहीतरी करत आहोत हे दाखवण्याचे केवीलवाणे उद्योग बंद करावे, असा खोचक टोला त्यांनी शिवसेना नेत्यांना लगावला आहे.

Raosaheb danave criticised shivsena leader ambadas danave on farmers loan waiver