राळेगणसिद्धी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. दरम्यान, अण्णांनी राज ठाकरे यांच्याशी बंद दरवाज्याआड चर्चा सुद्धा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अण्णांच्या उपोषणाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून यापुढे कुठली गोष्ट करु नका, असे त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जमलेल्या उपस्थितांनसमोर आवाहन केले. अण्णांच्या त्यावेळच्या जण आंदोलनामुळेच मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. परंतु आता त्यांना अण्णांचा आणि त्यांच्या प्रलंबित मागण्याचा पूर्ण विसर पडल्याचे राज ठाकरे म्हणाले. खरंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आज इथे यायला पाहिजे होतं असे सुद्धा राज ठाकरे म्हणाले.
त्यानंतर बोलताना एका घटनेची आठवण करून देताना राज ठाकरे म्हणाले की, १८ डिसेंबर २०१३ रोजी नरेंद्र मोदी यांनी टि्वट केले होते. लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे. आज सत्ता येऊन ५ वर्ष पूर्ण झाली. लोकपालची नियुक्ती का नाही झाली ? असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच उपोषण करताना जीवावर बेतेल अस काही करु नका, असा आपुलकीचा सल्ला सुद्धा त्यांनी अण्णांना भेटीदरम्यान दिला.
आपण सर्व एकत्र येऊ यांना गाडून टाकू असेही राज यांनी अण्णांना आवाहन केले. आज अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा सलग ६वा दिवस आहे. लोकपाल, लोकायुक्तासह अन्य मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत.
