नवी दिल्ली : भारतीय हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्यापूर्वीच त्या विषयीची महत्वाची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना सांगून मोदींनी देशाच्या संरक्षण विषयक अशा अत्यंत गोपनीय कायद्याचा भंग करीत एक प्रकारे देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केला. स्वत:ला देशाचा चौकीदार समजणाऱ्या मोदींवर या महाभयंकर गुन्ह्याबद्दल खटला चालवून त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणी सुद्धा त्यांनी उचलून धरली आहे.
दरम्यान, आम्ही सदर विषय सामान्य जनतेच्या न्यायालयात घेऊन जाऊ. तेथे त्याचा नक्की काय तो फैसला होईल. देशात आमचे सरकार आल्यावर सदर विषयाचा नक्कीच कायदेशीर पाठपुरावा करेल. राफेल करार होण्याच्या नेमके काही दिवस आधी अनिल अंबानी यांनी पॅरिसला जाऊन या होऊ घातलेल्या कराराच्या अनुषंगाने फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त होते. त्यात विमाने बनविणाऱ्या एका कंपनीने असा करार होणार असल्याचे अंबानी यांनी कळविल्याचा ई-मेल पाठविल्याचा देखील स्पष्ट उल्लेख होता.
ताज्या घटनाक्रमाने राफेल घोटाळयाच वास्तव समोर आलं आहे. पहिल्यांदा नियमाला सोडून केलेले व्यवहार आणि वशिलेबाजीचा मुद्दा होता. आता त्याला गोपनीयता भंग करण्याची देखील जोड मिळाली आहे, असे सुद्धा गांधी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राफेलविषयी ‘कॅग’ने सादर केलेला अहवाल ‘निरर्थक’ आहे, असे म्हणून गांधी यांनी त्या अहवालाचे ‘चौकीदाराच्या ऑडिटर जनरलचा रिपोर्ट’, असा उल्लेख केला.
