पुणे : काल पुण्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी सुजय विखे पाटलांवर सनसनाटी आरोप केला. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्विकारायला तयार होतो, परंतु सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. सुजयला आता माझ्या समोर आणा, हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे.
सुजय यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढावे असे त्यांना मी स्वत: सांगितले होते पण त्यांनीच या प्रस्तावाला नकार दिल्याने आमचाही नाईलाज झाला, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
शरद पवार हे पन्नास वर्षे सक्रीय राजकारणात आहेत. त्यांनी माढ्यातून माघार घेतली कारण राज्यसभेची मुदत 2020 पर्यंत आहे ती जागा विनाकारणच इतरांना द्यावी लागली असती. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असेही पवार म्हणाले. हवेचा रोख बघून शरद पवारांनी माघार घेतल्याचा आरोप निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. ज्यांच्या नावावर अनेक जण निवडून येतात, त्यांच्या बाबत असे विधान करणे चुकीचे आहे.
