मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडणारा पूल कोसळून ६ जण ठार तर ३४ हून अधिकजण जखमी झाल्याची दुर्घटना गुरुवारी घडली होती. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी आमदार नितेश राणे यांनी स्वतः जखमींची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शिवसेना सत्ताधारी असलेल्या मुंबई महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हि दुर्घटना घडली. सुरुवातीला या अपघाताची जबाबदारी कुणाची, रेल्वेची की महापालिकेची यावरून तू तू मै मै सुरु होती. मात्र दुर्घटनाग्रस्त पूल महापालिकेच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट झाले होते. जुन्या झालेल्या पुलांचे ऑडिट स्वतःचे ऑफिस नसलेल्या कंपनीने दिल्याचे उघडकीस आले होते.
मुंबई शहरात एवढी मोठी घटना घडूनही मुंबईचे तारणहार म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे घटनास्थळी फिरकलेच नाहीत, तसेच त्यांनी जखमींची विचारपूसही केली नव्हती. उलटपक्षी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी ते अमरावती येथे युतीच्या मेळाव्यात सहभागी झाले. आ. नितेश राणे यांनी या दुर्घटनेवरून शिवसेनेवर शरसंधान साधले होते. पेंग्विनला गोंजारण्यापेक्षा आणि मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यापेक्षा मुंबईकरांना सुविधा द्या, अशी मागणी राणे यांनी केली होती. आज नितेश राणे जखमींना दाखल करण्यात आलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमींची विचारपूस केली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला. यावेळी स्वाभिमानचे मुंबई अध्यक्ष राजेश हाटले, कुलाबा अध्यक्ष अनिल फोंडकर, किरीट राजपूत, विकास पवार, हर्षद पाटील, संकेत बावकर, महेश पावसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
