लखनौ : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच देशातील एकूण ९१ मतदारसंघात मतदान घेण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांसह दक्षिण आणि उत्तर भारतातही ठरल्याप्रमाणे मतदानप्रकिया पार पडली. परंतु, बहुतांश ठिकाणी ईव्हीएममध्ये मोठे घोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यूपीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भारतीय जनता पक्षाला मिळत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे.
आंध्र प्रदेशमध्ये १०० ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे सांगत पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. तर, जम्मू आणि काश्मीरच्या पुँछ येथे काँग्रेसचे बटणच दाबले जात नसल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन केला आहे. त्यानंतर, आता युपीच्या बिजनौर लोकसभा मतदारसंघातील मीरापुर आणि कैराना क्षेत्रातील एका बुथवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हत्तीचे बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशिनमधून बाहेर पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
याबाबत समजताच सपा-बसपा आघाडीचे उमेदवारही घटनास्थळी पोहोचले होते. कसौली येथील बुथ क्रमांक १६ येथे हत्तीचे चिन्ह दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु, दुसऱ्या क्रमांकाचे बटण दाबल्यानंतरही चौथे आणि पाचवे मतदान कमळाच्या चिन्हाला मिळत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
