पाटणा : लोकसभा निवडणुकीत भाजपचं भविष्य उत्तर भारतात मिळणाऱ्या यशावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशसोबतच बिहार मधील यश भाजपसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्याअनुषंगाने भाजपने बिहारमध्ये जातीय समीकरणाच्या आधारे एक अंतर्गत सर्वेक्षण केलं असून, त्यानुसार भाजपापेक्षा महागठबंधंन जातीय समीकरणांच्या बाबतीत बिहारमधील तब्बल १९ जागांवर आघाडीवर दिसत असून महागठबंधनमधील प्रमुख घटक पक्ष जातीय निहाय मतं स्वतःकडे आकर्षित करताना दिसत आहेत.
त्यामुळे भाजपच्या गोटात धाकधूक वाढल्याची चर्चा बिहारमध्ये रंगली आहे. महागठबंधनमधील प्रमुख घटक पक्ष स्वतःच्या सहकारी पक्षाकडे आपली मतं वर्ग करताना यशस्वी होत असल्याचे या सर्वेक्षणात समोर आलं आहे. महागठबंधनमध्ये काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रीय लोक समता पार्टी, जितन राम मांझी यांचा हिंदुस्थानी आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि मुकेश सहनी यांचा विकासशील इन्सान पार्टी यांचा समावेश आहे. सर्वेक्षणात या सर्व पक्षांना त्यांच्याशी संबंधित समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळे उत्तर भारतातील उत्तर प्रदेशासोबत बिहारमधील अनुमानाने सुद्धा भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे जर भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष बिहारमधील जातीय समीकरणं जुळवण्यात यशस्वी झाले नाही तर मोदी सरकारची दुसरी टर्म डखोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
