शिरूर : शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मोठ्या प्रतिष्ठेचा केला होता. त्यात राष्ट्र्वादीने आयत्यावेळी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांच्या विजयाचा निर्धार केला होता. विद्यमान खासदार आढळराव पाटील हे शिवसेनेतील दिग्गज नेते म्हणून परिचित असल्याने शिवसेनेने येथे प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळालं. या मतदारसंघात आढळराव पाटलांची स्वतःची अशी मोठी यंत्रणा असून त्यांना पराभूत करणे म्हणजे मोठं आव्हान असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं.

राष्ट्रवादीने देखील सर्वच नेत्यांना या मतदारसंघात कामाला लावले होते आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर मोठी जवाबदारी सोपवली होती. स्वतः शरद पवारांपासून ते अजित पवारांपर्यंत अशा सर्वच नेत्यांच्या या मतदारसंघात जाहीर सभा पार पडल्या. त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांची भाषण शैली देखील स्थानिक लोकांना भावल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेदेखील आयत्यावेळी मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिरूर मतदारसंघात झोकून देण्यास सांगितले. मात्र येथे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांपुढे प्रभाव जाणवला नाही.

त्यात मंगलदास बांदल यांच्यासारखी स्थानिक नेते मंडळीदेखील अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी उतरल्याने राष्ट्रवादीची ताकद प्रचारात उजवी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विचलित झालेल्या शिवसेनेच्या आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंच्या जातीचं आणि त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील विषयांना हात घातल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चिखलफ़ेक होऊ लागल्याने शिवसेनेचे पदाधिकारी देखील काहीसे विचलित झाल्याचे पाहायला मिळाले. परिणामी राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आढळराव पाटील यांचा शिरूर मतदारसंघात पराभव केला आहे. अमोल कोल्हे आता राजकारणातील जाईंट किलर ठरले आहेत.

राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ठरले जाईंट किलर! सेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव