अमरावती : बुजुर्गांनी लोकसभा निवडणूक लढवायला नको असा सल्ला निवडणुकीपूर्वी देणाऱ्या अमरावतीतून जिंकलेल्या नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचे नक्कीच आशिर्वाद देखील घेऊ असे सांगितले. एका खासजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केलं आहे, कारण आनंदराव अडसूळ माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या तर नक्कीच मी नक्कीच स्वीकारेन आणि मोठ्या मनाने अडसूळ आजोबांचे आशिर्वाद घ्यायला त्यांच्या घरी जाईन.

अमरावतीमधून स्वाभिमानी आघाडीतर्फे लढताना नवनीत राणा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या मतदार संघात शिवसेनेकडून मागील निवडणुकीत राणा यांचा पराभव केलेल्या आनंदराव अडसूळ यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा ३६,२९५ मतांनी पराभव केला आहे. राणा यांना ५,०७,८४४ मते मिळाली आहेत तर अडसूळ यांना एकूण ४,७०,५४९ मते मिळाली आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खचून न जाता मी मेहनत केल्याचे व त्याचे फळ मिळाल्याचे राणा म्हणाल्या. माझी लढाई अडसूळ यांच्याशी नव्हतीच तर नरेंद्र मोदींशी होती असे त्या म्हणाल्या. अडसूळांना जी काही मतं मिळाली ती मोदींमुळे असा दावा त्यांनी केला आहे. आपल्या मतदारसंघात महिला व युवकांवर लक्ष केंद्रीत केलं, त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला याचं फळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

…तर अडसूळ आजोबांचे निश्चितच आशिर्वाद घेऊ: नवनीत राणा-कौर