महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपात प्रवेश करण्याच्या ऑफर्स देत आहेत असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सतत आमच्या आमदारांना फोन करत आहेत. त्यासोबतच भाजप मधले काही नेते देखील काँग्रेसच्या काही आमदारांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या भाजपच्या वाटेवर असून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पक्ष प्रवेश काही दिवसांसाठी लांबवला आहे. त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील ह्यांनी काँग्रेस सोडून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार देखील झाले. राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या सोबत काँग्रेसचे काही आमदार घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणात चालणारा घोडेबाजार हा काही आपल्यासाठी नवा नाही. निवडणुका आल्या कि राजकारण्यांच्या माकडउड्या सुरु होतात. प्रत्येक राजकीय पक्षाला काही नैतिक मूल्यांचा आधार असतो परंतु पक्ष परिवर्तन केल्यानंतर आपण ज्या राजकीय पक्षांच्या मूल्यांवर टीका केली होती ते साफ विसरून नवीन नैतिक मूल्ये ते आत्मसाद करतात.
