भुवनेश्वर: डोंगरातून तब्बल तीन किलोमीटरचा कालवा खणल्यानं यंदा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या दैतारी नायक सध्या रोजगार नसल्यानं हालाकीची परिस्थिती जगात आहेत. मात्र पद्मश्री पुरस्कार मिळून देखील रोजचा रोजगार मिळण्यात प्रचंड अडथळे येत असल्यानं चरितार्थ चालवणं कठीण होत असल्याची व्यथा नायक यांनी मांडली. तर मोदी सरकारनं देखील आश्वासन न पाळल्याचा आरोप त्यांच्या मुलानं केला आहे.

ओडिशाच्या केनोझार जिल्हातील तालाबैतरणी गावात राहणाऱ्या ७५ वर्षीय दैतारी नायक यांना यंदा पद्मश्री मिळाला. गोनासिका डोंगरातून कुदळ आणि फावड्याच्या मदतीनं कालवा खणल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. २०१० ते २०१३ या कालावधीत त्यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळे १०० एकर जमीन सिंचनाखाली आली. याबद्दल केंद्र सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. परंतु याच पुरस्कारामुळे आपल्याला अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दैतारी यांनी सांगितलं. त्यामुळेच हा पुरस्कार परत करायची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कारण या पुरस्कारामुळे साधा रोजगार देखील मिळत नसेल तर तो पुरस्कार काय कामाचा असा सवाल त्यांनी केंद्राला केला आहे. पूर्वी मला शेतात मजूर म्हणून काम मिळायचं, परंतु आता मला शेतात मजुराची कामं देखील कोणीच देत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

मला पद्मश्री पुरस्काराचा कोणताही उपयोग नाही, अशा तीव्र शब्दांमध्ये त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. ‘मी आधी मजूर म्हणून शेतात काम करायचो. मात्र आता मलाही कोणीही काम देत नाही. पद्मश्री मिळाल्यानं मजुरीचं काम दिल्यास तो पुरस्कराचा अपमान ठरेल, अशी लोकांची भावना असते. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,’ अशी व्यथा दैतारी नायक यांनी मांडली. मी सध्या तेंदूची पानं आणि आंब्याचे पापड विकून कसाबसा उदरनिर्वाह करत आहे. त्यामुळे मला पद्मश्री पुरस्कार परत करायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी स्वतःची उद्विग्नता व्यक्त केली.

पद्मश्री पुरस्काराचा काय उपयोग? आता मला शेतात मजूर कामही मिळत नाही: पद्मश्री दैतारी नायक