सध्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये भिंत कोसळून दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना – भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही तसेच हा सत्तेचा माज आणि सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

पुढे अजित पवार म्हणाले दरवर्षी मुंबई महानगरपालिका नालेसफाई झाल्याचा दावा करते आणि प्रत्येकवर्षी तो दावा फोल ठरतो. सरकार यावर काहीच खबरदारी घेत नसल्याने माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत. जे आधीच आहे तेच सरकारला आणि महानगरपालिकेला सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला.

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास ६० जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या पावसाळी उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केला.

असलेलं नीट सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला – अजित पवार