नवी दिल्ली: ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असल्यानं महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्य निवडणूक आयोगाची प्रत्यक्ष भेट देखील घेतली. मागील २० वर्षांपासून ईव्हीएमवर सर्वांनीच शंका घेतली आहे. २०१४ आधी भारतीय जनता पक्षाने देखील ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला होता. परंतु २०१४ नंतर त्यांचा पूर्ण सूर बदलला, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या भेटीबद्दलची माहिती दिली.

ईव्हीएमची चीप अमेरिकेतून येत असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. त्यामुळे ईव्हीएम हॅक करण्यात परकीय शक्तीचा हात असू शकतो, असं राज ठाकरे निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेवर घ्या. त्यामुळे मतदारानं कोणाला मतदान केलं आहे, हे मतदाराला समजेल, असं राज ठाकरे म्हणाले. मतपत्रिकेची मोजणी केल्यामुळे २ दिवस उशिरा मतमोजणी पूर्ण होईल. परंतु ज्या देशात २ महिने लोकसभेची निवडणूक चालते. त्यात आणखी २ दिवसांची भर पडल्यास काय फरक पडणार, असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.

मी केवळ औपचारिकता म्हणून मुख्य निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. निवडणूक आयोगाला भेटलात का?, असं तुम्ही विचाराल म्हणून त्यांची (आयोगाची) भेट घेतल्याचं राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले. महाराष्ट्रात गेल्यावर ईव्हीएमबद्दलची भूमिका ठरवू, असं राज यांनी सांगितलं. गेल्या ऑगस्ट महिन्यात सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना यासाठी पत्र पाठवलं होतं. परंतु त्यावेळी कोणीही ऐकलं नाही. पण आता नक्की विचार करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील विधानसभा निवडणुक फक्त व फक्त कागदी मतपत्रिकांवरच व्हाव्यात: राज ठाकरे