मुंबई : शिवसेनेचं सध्या आदित्य ठाकरे अभियान जोरदारपणे सुरु आहे. प्रशांत किशोर यांच्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच्या मातोश्री भेटीनंतर या सर्व घटनांना अधिक गती आल्याचं पाहायला मिळालं. एकूणच आदित्य ठाकरे प्रत्यक्ष राजकारणात आणण्यासाठी शिवसेनेत मोठी योजना सुरु असून भाजपकडे कानाडोळा करून आणि त्यांच्यावर जास्त विश्वास न ठेवता ‘आदित्य अभियान’ सुरु आहे. प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानेच आदित्य संवाद सारखे इव्हेंट आयोजित करण्यात आले होते असं राजकीय जाणकार सांगतात. विधानसभेच्या अनुषंगाने शिवसेनेतील सर्व वरिष्ठ नेत्यांना डावलून आदित्य ठाकरे यांनाच सर्वोच्च स्थानी विराजमान करण्याचा मातोश्रीने जणू चंगच बांधला असल्याचं समजतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासयात्रेची घोषणा केल्यानंतर आता शिवसेना देखील युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्रात जन आशीर्वाद दौरा लवकरच घोषित करणार असल्याचे समजते. जुलै महिन्याच्या अखेरीस कोल्हापूर येथून हा दौरा सुरू होणार असल्याचे कळते.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासयात्रेची घोषणा करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला फडणवीस यांची विकासयात्रा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्यांनी शिवसेनेला मते दिली त्यांचे या दौऱ्यादरम्यान आभार मानले जातील, तर ज्यांनी मते दिली नाहीत त्यांची मने जिंकली जाणार असल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

विधानसभेत फडणवीसांना शह? लवकरच आदित्य ठाकरे यांचा ‘जन आशीर्वाद’ दौरा