मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातील आणि खिशाला परवडणारा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेच्या किमान प्रवासी भाड्यात कपात करण्यात आली आहे. बेस्ट बसच्या किमान भाडेकपातीला मुंबई महापालिकेची महासभा आणि आरटीएने अधिकृत मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र सराकने देखील भाडेकपातीला मान्याता दिली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बेस्टचे किमान बसभाडे हे ८ रुपयांवरून ५ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. दरम्यान, सदर निर्णयाला अनुसरून महाराष्ट्र सरकारकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, बेस्टचे नवे दर आजपासून प्रत्यक्ष लागू होणार आहेत.

बेस्टची किमान बसभाडे ८ रुपयांवरून कमी करून ५ रुपये करण्याचा निर्णय बेस्ट समितीच्या बैठकीत मागील मंगळवारी घेण्यात आला होता. याबाबतच्या प्रस्तावाला मागच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात महापालिकेच्या महासभेत अंतिम मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाने देखील (आरटीए) बेस्ट उपक्रमाच्या भाडेकपातीला अधिकृत मंजुरी दिली होती. अखेर काल भाडेकपातीच्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.

दरम्यान, बेस्टला महापालिकेने ६०० कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे १०० कोटी अनुदान देताना मुबई महापालिकेने काही अटी देखील बेस्टसमोर आधीच ठेवल्या. त्यानुसार भाडेकरारावर ५३० बस घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बस भाड्यात कपात करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीपुढे मांडला होता. दरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर बसभाडे कपातीचा प्रस्ताव एकमताने बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव पालिका महासभेपुढे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. यासाठी २७ जून रोजी तातडीची महासभा बोलाविण्यात आली होती.

‘बेस्ट’ निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू; किमान भाडं ५ रुपयांवर