जम्मू : कलम ३५- ए आणि ३७० वरून मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं होतं. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत होत्या. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर २ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही देखील मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतल्याची सर्वत्र रंगली आहे.

जम्मू व काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्य सभेत काल मांडला होता. यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यात येणार आहे. या तरतुदीमुळे जम्मू व काश्मीरचा दर्जा अन्य राज्यांप्रमाणेच होणार आहे अशा जोरदार बातम्या पसरू लागल्या.

दरम्यान, भारत सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयावर पाकिस्तानचा जळफळाट होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या संसदेत आज मोठा राडा झाला असून विरोधीपक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांना धारेवर धरले आहे. यावेळी पाकिस्तान सरकारनं भारताला जशीच्या तशी तीव्र प्रतिक्रिया द्यायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी केली. शरीफ यांना उत्तर देताना इम्रान खान यांनी भंजाळल्याप्रमाणे उत्तरे दिली आहेत.

दरम्यान काश्मीरचे रहिवासी असलेले माजी आयएएस अधिकारी आणि ‘जम्मू आणि काश्मीर पिपल्स मुवमेंट’ पक्षाचे सर्वेसर्वा असणाऱ्या शाह फैजल यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावरुन सरकारवर टिका केली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या सरकारच्या निर्णयावर फैलज यांनी फेसबुक पोस्टमधून टिका केली आहे. “जम्मू काश्मीरमधील लोक सर्व काही गमावून बसले असून आता लढाई सुरु ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही” असं फैलज यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

फैजल यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहेत याबद्दल सांगितले आहे. “लोकांना या निर्णयाचा धक्का बसला असून ते सुन्न झाले आहेत. या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे याचा अंदाज काश्मीरमधील जनतेला लावता येत नाही. जे काही गमावले आहे त्याचं दु:ख सर्वांना झालं आहे. कलम ३७० बद्दल मी येथील स्थानिकांबरोबर चर्चा केली त्यावेळी त्यांनी हा निर्णय म्हणजे राज्याचे नुकसान असल्याचे मत व्यक्त केले. अनेकांनी या निर्णयाचे दु:ख झाल्याचे म्हटले आहे. हा निर्णय म्हणजे मागील ७० वर्षात भारताने येथील लोकांचा केलेला हा सर्वात मोठा विश्वासघात आहे अशा दृष्टीकोनातून याकडे पाहिले जात आहे,” असं फैजल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

“ज्या स्थानिक नेत्यांना अटक झालेली नाही त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून शांतता कायम राखण्याचे विनंती स्थानिकांना केली आहे. या निर्णयानंतर होणाऱ्या हिंसेत ८ ते १० हजार जणांचा मृत्यू होईल आणि सरकार त्यासाठी तयार आहे अशी चर्चा इथे आहे. त्यामुळेच कोणालाही या नरसंहाराची संधी देता कामा नये असं आमची विवेकबृद्धी आम्हाला सांगते. या निर्णयाला उत्तर देण्यासाठी आपण जिवंत रहायला हवे असं मला वाटतं,” असं फैलज यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कलम ३७० निर्णयानंतर होणाऱ्या हिंसेत ८ ते १० हजार जणांचा मृत्यू होईल: शाह फैजल