सांगली: राज्यावर जल-आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेते पर्यटनस्थळाला भेट दिल्या सारखे हेलीकॉप्टर आणि बोटीमधून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारवर विरोधकांनी चांगलीचं टीकेची झोड उठवली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यानंतर विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेले गिरीश महाजन चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा आविर्भावात फिरताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि पोलीसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून त्यांना लक्ष करण्यात येत आहे.

दरम्यान, सुभाष देशमुख राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री असूनही आधी नाशिक, नंतर पुणे, नंतर कोल्हापूर, नंतर कोकण आणि आता सांगली अशा ५ राज्यांमध्ये पावसानं जनसामान्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. परंतु, तरीदेखील सुभाष देशमुख मात्र कुठेही पाहाणी करताना दिसले नाहीत. अखेर, शुक्रवारी त्यांना वेळ मिळाला असून ते दुपारी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुभाष देशमुख एकामागोमाग पूरग्रस्त भागावर लक्ष ठेऊन असल्याचे फोटो ट्वीट करत होते. मात्र, प्रत्यक्ष त्या घटनास्थळावर ते दिसले नाहीत. विशेष म्हणजे सांगलीतील आपत्तीचा आढावा ते मुंबईत बसून घेत आहेत.

मुंबईत बसून सांगलीचा आढावा घेणारे पालकमंत्री सुभाष देशमुख आज दुपारी सांगलीत प्रकटणार