इस्लामाबाद : जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबंधांवर बुधवारी घाव घातला. पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले असून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले आहे. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने रोखला आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानी अतिरेक्यांनी जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी आधीच राजनैतिक पातळीवरील संवाद थांबवला आहे, तर पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी व्यापारी संबंध रोखले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या ‘आक्रमक’ पवित्र्यातील हवा आधीच गेली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान अशा तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत. पाकिस्तानी सैन्यातील सशस्त्र जवानांचा ताफा लडाख सीमेजवळ पोहचत आहे. तसेच याठिकाणी पाकची लढाऊ विमानंही तैनात करण्यात आली आहे. शस्त्र घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानने सी १३० एअरक्राफ्ट्सचा वापर केला आहे.

सरकारी सूत्रांच्या हवाल्यानुसार लडाख हा केंद्रशासित प्रदेश जाहीर केल्यानंतर सीमेवर असणाऱ्या एअरबेसवर शनिवारी पाकिस्तानी वायूसेनेचं सी -१३० एअरक्राफ्ट्स काही सामान घेऊन दाखल झालं आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर ठेऊन आहेत. तसेच पाकिस्तानची वायूसेना JF-१७ हे लढाऊ विमानही याठिकाणी तैनात करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

लडाख सीमेवर पाकिस्तानची लढाऊ विमानं तैनात