मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकी अगोदर काँग्रेस व राष्ट्रावादीतील दिग्गज नेत्यांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे सत्र जोरदार सुरू आहे. आज दुपारीच काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेल्या व उत्तर मुंबई मतदारसंघातून पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असताना आता, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. तसेच, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार दलबद्दल सुरु आहे. त्यात सर्वाधिक भरणा हा भाजपअधे सुरु असून त्यात काँग्रेस राष्ट्रवादीतील भ्रष्टाचाराचे आरोप आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले नेतेमंडळी अधिक असल्याचं समोर आलं आहे. भाजप कितीही म्हणत असेल की आम्ही भ्रष्टाचाराला थारा देत नाही, पण वास्तविक इतर पक्षातील असेच भ्रष्ट नेते भाजपमध्ये आणून त्यांना पावन करून घेण्याची जोरदार सुरुवात झाली आहे.

त्याचाच एक प्रत्यय म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंग यांच्या घरी गणपती दर्शनाला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. तत्पूर्वी कृपाशंकर सिंग यांच्यावर आधीच बेहिशेब संपत्तीवरून राज्य सरकारकडून चौकशी सुरु आहे. त्यात गृहखातं मुख्यमंत्र्यांकडे असल्याने सर्वच शक्यता कृपाशंकर सिंग यांनी चाचपडल्या असाव्यात. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून स्वतःला पावन करून घेण्यासाठी ते मागील काही महिन्यांपासून धडपडत होते.

त्यात भाजप शिवसेनेला अंधारात ठेवून त्यांच्या विरुद्ध विधानसभेची व्यूहरचना देखील आखात आहे असं समजतं. त्याचाच प्रत्यय म्हणजे मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय पोतनीस यांच्या विरुद्धची व्यूहरचना असल्याचं वृत्त आहे, ज्याची तयारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुरु केली होती. दरम्यान, सेनेच्या हमखास निवडून येणाऱ्या जागांवर अशाच पावन करून घेतलेल्या उमेदवारांना उभं केलं जाईल, अशी शक्यता आहे.

भ्रष्टाचार प्रकरण: उद्या कृपाशंकर सिंह यांना गुजरातच्या वॉशिंग पावडरने धुवून भाजपमध्ये घेणार