वसई: एक दोन दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच पक्ष आणि त्यांचे संभाव्य उमेदवार कामाला लागल्याचं दिसत आहे. नुकताच पोलीस खात्यातून राजीनामा देत राजकरणात प्रवेश करणारे मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर त्यांना नालासोपारा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरवल जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
ठाकूर कुटुंबीयांची वसई-विरार पट्ट्यातील एकाधिकारशाही संपुष्टात आणण्यासाठी शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवल्याचे म्हटले जातं आहे. त्यानिमित्ताने काल नालासोपारा विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी शिवसेना प्रवेशानंतर पहिल्याच एन्ट्रीला २०० बाईक्स, १०० कार, ४० रिक्षा घेऊन विरार फाटा ते नालासोपारा (पच्छिम) अशी रॅली काढली.
दरम्यान, वावेळी त्यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ‘आम्ही दाऊदला मुंबई सोडायला लावली असून इथे कोण दादागिरी करेल, त्यालाही मुंबई सोडायला लावू’, असा टोला प्रदीप शर्मा यांनी वसई-विरारमध्ये २८ वर्षांची एकहाती सत्ता असलेल्या आमदार हितेंद्र ठाकुराना नाव न घेता लगावला आहे. यावेळी मंचावर त्यांच्यासोबत ठाण्याचे आमदार रवींद्र फाटक देखील उपस्थित होते.
विरारमध्ये एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. भरपावसात ही रॅली काढण्यात आली. येथे नळाला पाणी येत नाही तर लोकांच्या घरात पाणी येत असल्याचे शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रदीप शर्मा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते आगामी विधानसभेचे संभाव्य उमेदवार आहेत. वसई-विरारमध्ये सर्व भूमिपुत्र एकत्र आले असून शर्मा यांचा विजय निच्छित असल्याचा दावा आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्धन पाटील यांनी केला आहे.
