मुबई: शिवसेनेने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्यात ७० उमेदवारांच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. इथले शिवसेनेचे प्रमुख विरोधक असलेले राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष सचिन अहिर यांनाच शिवसेनेने पक्षात घेतल्यामुळे आता हा शिवसेनेसाठी ‘सेफ’ मतदारसंघ झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्याकडून आदित्य ठाकरेंना कडवी टक्कर दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, आता राज ठाकरे यांनी वरळीतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही निवडणूक अधिकच सोपी झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये वरळीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिलेला नाही. वरळीतून मनसेचे संतोष धुरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघात विविध कामं करत आहे. त्यामुळे त्यांचं नाव पहिल्या यादीत येईल अशी अपेक्षा होती.

एकीकडे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल पहिल्या यादीमध्ये या मतदारसंघातून उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंना विरोध करण्याऐवजी त्यांना मदत करताना दिसत असल्याची चर्चा रंगली आहे.

काकाचा दिलदारपणा दिसणार? मनसे वरळीतून उमेदवार देणार नसल्याचं वृत्त