कल्याण: महाराष्ट्रात अजून सत्तेत कोण विराजमान होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित झालं नसलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामान्य लोकांच्या आंदोलनात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी काल आगरी समाज प्रतिष्ठानने टोरेंट पॉवर कंपनीविरोधात आयोजित केलेल्या भव्य मोर्चात सहभाग नोंदवला.

यावेळी भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले की, सदर कंपनीला माझा यापूर्वीच विरोध राहिलेला आहे आणि राज्यातील मंत्रिमंडळ अजून ठरलं नसल्याने प्रशासनाने तूर्तास या कंपनीच्या नव्या कार्यालयास स्थगिती द्यावी अशी विनंती देखील केली आहे. काही झालं तरी आम्ही टोरेंट पॉवर कंपनी येथून हटवणार म्हणजे हटवणार असा निश्चय यावेळी करण्यात आला.

तत्पूर्वी, डोंबिवली जवळील आणि शीळरोडवरील देसाई गावात देखील आगरी समाज प्रतिष्ठानचे टोरेंट पॉवर कंपनी विरोधात आमरण उपोषण पुकारली होती, मात्र त्यावेळी स्थानिक राजकीय नेत्यांच्या हाकेला प्रशासनाने केराची टोपली दाखवली होती. टोरेंट पॉवर कंपनी हटाव अशी मागणी आगरी-कोळी संघटना तसेच इतर काही संघटनाने अनेक वेळा केली आहे.

शीळरोड वरील विविध गावे, दिवा, मुंब्रा याभागात टोरेंट पॉवर या कंपनीला विजेच कंत्राट देण्यात आले आहेत आणि ती रद्द करावी यासाठी आगरी समाज प्रतिष्ठानने अनेक उपोषणं केली आहेत, मात्र त्याला यश आलेले नाही. सदर उपोषणला गावातील नागरिकांनी जाहीर पाठींबा दिला होता. मात्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र आता आगरी समाजाचे आमदार राजू पाटील आणि मनसेचे आक्रमक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी रस्त्यावर उतरणार असल्याने गावकऱ्यांच्या आणि आगरी-कोळी समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्वतः आमदार राजू पाटील हा विषय सरकार दरबारी देखील उचलून धरणार असल्याचं वृत्त आहे.

आगरी समाज प्रतिष्ठानसोबत मनसेचे आ. राजू पाटील टोरेंट पॉवर कंपनी विरोधात आक्रमक