मुंबई: देवेंद्र फडणवीसांकडून माझ्यावर खोटेपणाचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी मला खोटं म्हटल्यामुळे मी संवाद थांबवलाय. त्यामुळे यापुढे भाजपा खरं बोलणार असेल तरच युती होईल, असा ठाम पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, “खोटेपणा स्वीकारेपर्यंत फडणवीसांशी मी बोलणार नाही. मला वेळ असला तरी मला त्यांच्याशी बोलायच नाही. मला असला खोटा नेता नको आहे. युती ठेवायची असेल तर त्यांनी आधी शपथ घ्यावी की मी खोट बोलणार नाही. खोट बोलून सत्तेचे गाजर दाखवून काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजकारण करु नये.”

”मात्र आता मला खोटा ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. खोटं बोलणं आमच्या संस्कारात नाही. खरा कोण, खोटा कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे खोटारडेपणा जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्षाशी चर्चा करणार नाही. तसेच मला खोटा ठरवत असतील तर भाजपाशी कोणतंही नातंही ठेवणार नाही,” असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ”चर्चेसाठीचे दरवाजे आम्ही बंद केलेले नाही. मात्र भाजपावाले खोटे बोलले त्यामुळे आम्ही चर्चा थांबवली आहे. तसेच आम्ही एनसीपीशी चर्चा केलेली नाही,” असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

येत्या काळात शिवसेनेसमरो इतर पर्यायही उपलब्ध आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले आहेत. ‘मला एका गोष्टीचं वाईट वाटलं, की माझ्यावर खोटरडेपणाचा आरोप लावला. अमित शाह आणि कंपनीने माझ्यावर कितीही आरोप लावले तरी जनतेला माहीत आहे की आमच्यात काय ठरलं आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी युती करण्यासाठी मी काही लाचार नाही,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

चुकीच्या लोकांसोबत युतीकरून गेलो याचं दु:ख: उद्धव ठाकरे