मुंबई: राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्याचं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या धक्क्यातून फडणवीस अजून सावरताना दिसत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षाची कामं कशाप्रकारे करता येतील यापेक्षा अजून सत्तेत कसे येऊ याचीच स्वप्नं पडताना दिसत आहेत. सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील भारतीय जनता पक्षाचे नेते अजून वास्तव स्वीकारताना दिसत नाहीत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “बाळासाहेब थोरात म्हणाले, त्याप्रमाणे आमचा डीएनए विरोधी पक्षाचाच आहे. विरोधी पक्षामध्ये मी बराच काळ काम केलं आहे. आतापर्यंत संविधानाच्या आणि नियमाच्या आधारेच मी मुद्दे मांडतो. मी कालही नियमाला धरून बोललो. पुढेही विरोधी पक्षनेता म्हणून नियमांच पुस्तक आणि संविधान याच्या पलिकडे जाऊन कोणताही मुद्दा रेटून नेणार नाही.

राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाला जनादेश दिला आहे. सर्वाधिक जागा आम्ही जिंकल्या. मात्र, जनादेशाचा सन्मान आम्ही राखू शकलो नाही. मी पुन्हा येईन म्हणालो होतो तो जनतेच्या विश्वासावर. जनतेनेही विश्वास दाखविला. मात्र, निकालानंतर राज्यात सत्तेसाठी विचित्र समीकरणे जुळविली गेली, त्यामुळे आता पुन्हा सत्तेवर येणे अशक्य काही नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते, तर भविष्यात अशक्य काही नाही’, असा इशारा देतानाच, ‘मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना…, मैं समंदर हूं लौटकर जरूर आऊंगा’, असे सांगत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले.

फडणवीसांच्या या शायरीचं कनेक्शन भारतीय जनता पक्षाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आहे. अमित शहा यांनी ९ वर्षापूर्वी हीच शायरी गुजरातच्या विधिमंडळात म्हटली होती. सन २०१० मध्ये गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी, अमित शहांनी हीच शायरी म्हटली होती. महाराष्ट्राच्या विधानभवनात देवेेंद्र फडणवीस यांनी अमित शहांच्या शायरीची कॉपी केली. विशेष म्हणजे, ३ महिन्यानंतर अमित शहांची सुटका झाली होती.

शहांना २०१० मध्ये अटक झाल्यावर जी शायरी शहा बोलले होते तीच फडणवीसांनी कॉपी केली