रत्नागिरी: लोकसभा निवडणुकीनंतर आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात राजकीय युद्ध पेटलं होतं. नारायण राणे यांना शिवसेना सोडून अनेक वर्ष झाली असली तरी उद्धव ठाकरे आणि राणे कुटूंबातील वाद क्षमण्याची शक्यता नाही. विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गमधील प्रचारादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वादाला मोठं तोंड फोडलं होतं आणि त्यानंतर खासदार नारायण राणे देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळालं होतं. कारण उद्धव ठाकरे यांनी थेट कोकणात सभा घेऊन नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती.
त्यात आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ असलेल्या कणकवलीतील सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंवर केलेल्या विखारी टीकेला खासदार नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रयात जाऊन प्रतिउत्तर देणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती झाली होती तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि त्याला प्रमुख कारण होतं उद्धव ठाकरे आणि खा. नारायण राणे यांच्यातील राजकीय वैर हेच कारण होतं.
मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे कुटुंबातील कटुता किंचितही कमी झालेली नाही. सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघात शिवसेनेनं एकवेळचे राणे समर्थक सतीश सावंत यांनाच उघडपणे नीतेश राणे यांच्या विरोधात मैदानात उतरवलं होतं. तर, सावंतवाडी व कुडाळ मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बंडखोर शिवसेनेसमोर उभे केले गेले.
मात्र निवडणुकीनंतर वांद्रात जाऊन उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर देणार असं सांगताना त्यांना याची अजिबात कल्पना नसावी की भाजपाची सत्ता जाणार आहे आणि शिवसेना सत्तेत येऊन थेट उद्धव ठाकरेच स्वतः राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत. परंतु, तीच उणीव भरून काढण्यासाठी खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समाज माध्यमांवरून लक्ष करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु केला आहे. विशेष म्हणजे जे प्रश्न माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण ५ वर्षात फडणवीसांना केले नाहीत ते सर्व प्रश्न ते उद्धव ठाकरे यांना दर दिवशी करताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी ट्विटर वॉर सुरु केलं आहे.
