मुंबई: ‘बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून द्या,’ या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच एक मोर्चा काढणार आहे. परंतु या मोर्चाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून जिजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदानाचा मार्ग मागण्यात आला आहे. मोर्चासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये मनसे नेत्यांचा हा निर्णय झाला आहे. हा मोर्चा मोहम्मद अली रोडवरुन नेण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आग्रही आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील पेच वाढण्याची शक्यता आहे.
येत्या ९ फेब्रुवारी २०२० ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांग्लादेशी-पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढणार! https://t.co/WOIY5vGLUu#मनसे_अधिवेशन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 25, 2020
देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समुदाय रस्त्यावर उतरला असून मनसेच्या मोर्चाचा मार्ग हा मुस्लीम बहुल भागातून जाणार आहे. त्यामुळे या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच राज ठाकरेंच्या सुरक्षेचा प्रश्नही पोलिसांसमोर आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाला अन्य मार्गावरुन जाण्यास परवानगी दिली जाऊ शकते. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसेने पोलिसांकडे परवानगी मागितली असून पोलीस योग्य तो निर्णय घेतील असं सांगितलं आहे.
तत्पूर्वी, मनसेचा मोर्चा हा CAA आणि NRCच्या समर्थनासाठी नाही असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यावर चर्चा होऊ शकते मात्र समर्थन होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. नव्या भूमिकेमुळे राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आपण भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जात नाही हेच राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं असल्याचं बोललं जात आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची या मोर्च्याच्या तयारीबाबत बैठक झाली असून मुंबई पोलिसांकडे मनसेने परवानगी मागितली आहे. मोर्चा आझाद मैदानात संपणार हे नक्की पण सुरु कुठून होणार हे पोलिसांनी परवानगी आल्यानंतर कळेल असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.
Web Title: MNS Morcha pass from Mumbai Mohammed Ali Road under Raj Thackeray security question Mumbai police.
