मुंबई: कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भारतीय जनता पक्षाच्या जवळचे लोक होते, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अशा लोकांचे पितळ उघडे पडेल या भीतीनेच एनआयएची चौकशी लावली असे देशमुख यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या हिंसाचार प्रकरणी राज्य व केंद्र सरकारमध्ये गेले काही दिवस तणातणी सुरू आहे. देशमुख म्हणाले, या हिंसाचारामागील वास्तव समोर यावे म्हणून खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. त्यावर काही कार्यवाही होण्याआधी केंद्राने एनआयए चौकशीचे आदेश दिले. राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी केली असती तर या भाजपच्या विचारांविरुद्ध बोलणाऱ्यांची नावे हिंसाचार प्रकरणात गोवल्याचे उघड झाले असते.
तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगासमोर उलट तपासणी करा, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय लाखे पाटील यांनी केली आहे. आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी करण्यात यावी यासाठी त्यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी मी तपास आयोगाकडे केली आहे. फडणवीस यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात कारवाईसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, असं लाखे पाटील यांनी सांगितलं.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावावं, त्यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी घ्यावी, मागील भाजपा सरकारने या प्रकरणात अर्बन नक्षलचा मुद्दा आणला पण खऱ्या आरोपींची चौकशी केली नाही. चौकशी आयोगाने या घटनेतील सर्व कॉल रेकॉर्ड, पोलीस कंट्रोल रुमचे कॉल्स, वायरलेसचे कॉल याबाबत सर्व तपासणी करावी असं संजय लाखे पाटील यांनी मागणी केली आहे.
माजी मुख्यमंत्र्यांचं निवेदन म्हणजे हिंदूत्त्ववादी नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारं आहे. हिंसाचारात भगवे झेंडे फडकावणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचं स्थानिक पोलिसांनी संरक्षण केलं, यावरही त्यांनी भाष्य केलं नाही. फडणवीस यांचं निवेदन आणि पोलिसांच्या तपासात विसंगती असल्याने त्यांना चौकशीसाठी बोलवणं गरजेचं आहे, असा डॉ. संजय लाखे पाटील यांनी याचिकेत म्हटलं आहे.
Web Title: Pune Koregaon Bhima violence accuses peoples are related to BJP Party says Home Minister Anil Deshmukh.
