मुंबई: दिल्लीत अरविंद केजरीवाल ‘वॉल’ बनून उभे ठाकले असून ‘आप’च्या झाडूपुढे भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचा पुन्हा एकदा सफाया झाल्याचे आतापर्यंतच्या मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला दोष देत ३ पेक्षा एकजरी जागा जास्त जिंकली तरी भारतीय जनता पक्षासाठी हा विजयच आहे, असं म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, दिल्लीच स्पष्ट विश्लेषण असं आहे की, भारतीय जनता पक्षाला देशभर एकटं पाडण्यासाठी वाटेल ती तडजोड करून सर्व एकत्र येत आहेत. महाराष्ट्र हे त्याचं मोठं उदाहरण आहे. ज्या दिल्लीत १५ वर्षे काँग्रेसनं राज्य केलं, त्याच काँग्रेसला चार टक्के मतं पडत आहेत. ही जी काँग्रेसची मतं दुसरीकडे वळाली त्यामध्ये आमचा पराभव म्हणता येणार नाही.

तत्पूर्वी, दिल्ली विधानसभा जिंकण्याचा पण करून भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. मुख्यमंत्री पदाचा कोणताही चेहरा न देता भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. ही झारखंड आणि महाराष्ट्रात आलेल्या अपयशानंतर भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केली होती.

 

Web Title: Delhi Assembly Election 2020 BJP Maharashtra President Chandrakant Patil blames congress for vote shift.

दिल्लीत ३ पेक्षा जास्त जागा हा आमचा विजयच; राज्यात भाजप १२२ वरून १०५ वर आला आहे