मुंबई : संपूर्ण राज्यात मराठी नववर्षाचा उत्साह संचारलेला पाहायला मिळत आहेत, त्यात आपल्या सर्व मराठी तरुणींचा आणि तरुणांचा उत्साह भरभरून पाहावयास मिळत आहे. संपूर्ण तरुणाई आणि बच्चे कंपनी सुद्धा त्याच्या आई-वडील आणि आजी-आजोबांसोबत उत्साहात फेटे आणि मराठी संस्कृतीला फुलवणारे वस्त्र परिधान करून पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देऊन अभिमानाने आपले मराठी नववर्ष साजरा करत आहे हे पाहून ‘चिंतामणीरावांना’ मात्र खूप आनंद झाला आहे.

विशेष करून त्या मराठी तरुणी ज्या मोठ्या आवडीने महाराष्ट्राची शान असलेला फेटा आणि महाराष्टाच्या स्त्रियांची ओळख असलेली नऊवारी साडी नेसून जेव्हा ढोल ताशाच्या तालावर लेझीम आणि मर्दानी खेळ करत आपल मराठी नववर्ष अभिमानाने साजर करतात ना ते पाहून वडीलधाऱ्या ‘चिंतामणीरावांचे’ डोळे सुद्धा पाणावले. कारण हेच सर्व मराठी तरुण आणि तरुणी उद्या या महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी सण पुढच्या पिढीला प्रदान करणार आहेत हे पाहून ‘चिंतामणीरावांना’ खूप आनंद झाला आहे.

तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल कोण हे ‘चिंतामणीराव’ ?

चिंतामणीराव म्हणजे तुमच्यातलाच एक सामान्य मराठी माणूस जे आज आयष्याचा बराच अनुभव घेऊन वयाची सत्तरावी साजरी करत आहेत. सामान्य मराठी माणूस म्हणून दैनंदिन आयुष्य जगताना त्यांना बरेच चांगले वाईट अनुभव आले. परंतु वैयक्तिक आयुष्य जगताना अनुभवलेल्या बऱ्याच चांगल्या-वाईट अनुभवा प्रति एक नागरिक म्हणून ‘व्यक्त’ होण्याची कधी उसंतच त्यांना मिळाली नाही. ते अनुभव होते दिवसेंदिवस हद्दपार होत चाललेला मराठी माणूस, मराठी भाषेवर होत असलेलं अतिक्रमण, दुबळा होत चाललेला कडवट मराठी स्वाभिमान, समाज माध्यमांमुळे माणसापासून दुरावणारा माणूस, हळूहळू लोप पावत चाललेली मराठी संस्कृती, शहरी विचारधारणेतून आपल्यापासून दुरावलेला ग्रामीण भागातील कष्टकरी मराठी बळीराजा आणि मुख्य म्हणजे कडवट मराठी स्वाभिमान गमावलेली महाराष्ट्राची राजकीय स्थिती आणि पाठीचा कणाच नसलेले मराठी राजकारणी, ज्यांची महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला टिकविण्यासाठी नितांत गरज आहे.

परंतु व्यक्त होताना ‘चिंतामणीरावांना’ त्यांच्या मनातील खऱ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. समाज माध्यमांवरील खोट्या आणि व्यक्तिगत राजकीय द्वेषातून जर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती, प्रगती आणि साहित्यातील ताकद पाहिली गेल्यास महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं केवळ नुकसानच होणार आहे हे ‘चिंतामणीरावांना’ चांगलच ज्ञात आहे.

त्यामुळेच आज मी ‘चिंतामणीराव’ वयाच्या सत्तरावीत तुमच्याशी ‘व्यंगचित्रातून’ दर आठवड्याला ‘महाराष्ट्रनामा.कॉम या वेब न्यूज च्या माध्यमातून संवाद साधणार आहे. अपेक्षा करतो तुम्ही सर्व तरुण, तरुणी आणि प्रत्येक वडीलधारी मानस त्या विचारांना व्यक्तिगत नजरेतून न पाहता ‘प्रामाणिक सामान्य मराठी माणसाच्या’ विचारातून पहा, मनातून विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा; कारण आपण इतरांशी खोटं बोलू शकतो परंतु स्वतःशी नाही.

मला खात्री आहे ‘मी चिंतामणीराव’ उद्या प्रत्येक मराठी घराघरात ओळखीचा ‘आपला सामान्य मराठी माणूस’ म्हणून परिचित असेन.

काळजी घ्या आणि मोठ्या आनंदाने आपले सण, उत्सव आणि संस्कृती साजरी करा आणि तशीच पुढच्या पिढीला प्रदान करा.

भेटू….तुमच्यातलाच सामान्य मराठी माणूस ‘चिंतामणीराव’ !

Happy Gudhi Padava from Chintamanirao a common Marathi Manus