मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे म्हणजे भिडे गुरुजी यांना अटक करण्यात यावी म्हणून आणि राज्य सरकार संभाजी भिडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत अखेर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप करत आज २६ मार्च या दिवशीच मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या नैतृत्वाखाली संभाजी भिडेंना अटक व्हावी म्हणून एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने प्रकाश आंबेडकरांचे समर्थक आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ जमणार आहेत असे सांगितले जाते.
पुण्यातील भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला अभिवादन करून येताना आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक करण्यात आली होती. त्या घटनेनंतर राज्यभर हिंसाचार उसळला होता. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचाच या घटनेशी थेट संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यातील मिलिंद एकबोटेंना अटक झाली असून, संभाजी भिडेंना सुद्धा अटक व्हावी म्हणून ह्या एल्गार मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना अटक झालेली नाही. राज्य सरकार संभाजी भिडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर केला आहे.
राज्यभरातून कार्यकर्ते सकाळपासूनच जमायला सुरुवात झाली असून, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी राज्यसरकार जवाबदार असेल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे पोलिसांनी या एल्गार मोर्चाला परवानगी नाकारली असून, सरकार जाणीवपूर्वक लोकशाहीचा गळा घोटात असून मोर्चा निघणार म्हणजे निघणार असा इशाराच प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी म्हणून २६ मार्च ही अंतिम तारीख प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला दिली होती. तसे न झाल्यास मुंबईत एल्गार मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सरकारला आधीच दिला होता. मुंबईत प्रचंड पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून, प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
