पुणे, जून: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउनमुळे सर्व नागरिकांना घरातच थांबावं लागले. त्यामुळे प्रदुषण तर कमी झालेच शिवाय… पक्षी आणि प्राण्यांना मोकळा श्वास घेता आल्याचं समोर आलं. मागील दोन महिन्यापासून देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. त्यामुळे गंगा नदीसारख्या अनेक नद्या स्वच्छ तर झाल्याच शिवाय मुंबई आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरातील प्रदुषण कमी झाले आहे. प्राणी आणि पक्षांनीही त्यामुळे मोकळा श्वास घेतला.

तसेच कोरोनानंतरच्या काळात स्वच्छता, सुरक्षितता वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. त्यावेळी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. कोरोना संकटाशी लढत असताना पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धनाची गरज ठळकपणे जाणवते आहे. मानवी जीवनात निसर्गाचं आणि निसर्गातील वनं, वन्यप्राण्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे’, असेही अजित पवार म्हणाले.

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे निसर्गातील मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. परिणामस्वरूप ओढे, नाले, नद्या, पाण्याचे स्त्रोत, प्रवाह स्वच्छ झाले आहेत. हवेतील प्रदूषण कमी होऊन मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे. स्वच्छ वातावरण मनाला आनंद देत आहे. वन्यप्राण्यांचे दुर्मिळ दर्शन घडू लागले आहे. निसर्गाचे, पर्यावरणाचे हे स्वच्छ स्वरूप भविष्यात अधिक समृद्ध करायचे आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

आज किंवा उद्या कोरोनाचं संकट नक्की संपेल. त्यानंतर जेव्हा आपण घराबाहेर पडू त्यावेळी निसर्गाला, पर्यावरणाला नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वनं, वन्यप्राणी हे वैभव आहे त्याचे जतन केले पाहिजे, अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. करोनानंतरच्या काळात ओढे, नाले, नद्या, पाण्यांचे स्त्रोत, हवेत प्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहिले पाहिजे. माणसाला जगण्यासाठी पर्यावरणाची किती गरज आहे, हे अडीच महिन्याच्या टाळेबंदीच्या काळात अनुभवले आहे. यातून बोध घेऊन आपण आजचा जागतिक पर्यावरण दिन साजरा करुया. पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी कटीबद्ध होऊया, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

 

News English Summary: While the World is busy fighting Corona, the need for environmental protection and conservation is important! Our forests & wildlife are our pride, let’s be careful not to be the cause of pollution & be committed towards preserving our environment said Deputy Chief Minister Ajit Pawar News latest Updates.

News English Title: Environmental hygiene is more important along with personal hygiene Deputy CM Ajit Pawar News Latest Updates.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची गरज ठळकपणे जाणवत आहे – उपमुख्यमंत्री