मुंबई : एप्रिल महिन्याच्या शेवटी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यावेळी अनेक कुचकामी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता असून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अनेक मंत्र्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे समजते. या मंत्रिमंडळ विस्तार अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असली तरी मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कोणताही खुलासा अजून केलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार एसआरए घोटाळ्यामुळे प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार असल्याचे समजते. तसेच भाजपला मुंबई महापालिकेत यश मिळवून दिल्या बद्दल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
