“आज जर आमचे शिवाजी महाराज असते तर बलात्कार करणाऱ्यांचे शीर आमच्या चौकात टांगलेले असते”. होय हे खरं आहे, महाराज असते तर हे नक्कीच घडले असते. सध्या सोशल मीडियावर काही छायाचित्र व्हायरल होत आहेत, ज्या मध्ये कोल्हापूरचा मुस्लिम समाज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देतोय.
मागच्या आठवडा भरात आपल्यासमोर व्यभिचाराची कित्तेक उदाहरणे समोर आली असून, त्याचे फक्त राजकारण होताना दिसत आहे. पण आपल्या माय भगिनींवर होणारे अत्याचार आणि त्यांचा आक्रोश कोणालाच पाहायचा नाही असे दिसतेय. मुळात अशा गुन्हेगारांना जात, धर्म, पंत असतो का हाच मुळात प्रश्न आहे. अंधवासनेने माय भगिनींवर बलात्कार करून त्यांच्या शरीराचे लचके तोडून त्यांना मृत्यूच्या खाईत ढकलणे हाच आहे का पुरुषार्थ? नक्की आपला समाज कुठल्या दिशेने वाटचाल करतोय याचाच प्रश्न पडलाय.
दुष्मनाच्याही माय भगिनींचा आदर करणारा आमचा राजा आणि त्यांचा न्याय, याची आज आम्हाला नक्कीच उणीव भासतेय. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात, धर्म, पंत या गोष्टींना थारा दिला नाही आणि परस्त्री माते समान अशी शिकवण दिली. त्यांच्या नावाचा वापर करून राजकारण करणारे आज त्यांचे विचारच सपशेल विसरले असावेत बहुतेक. म्हणूनच कि काय आज सर्व जनमानसाला आमच्या राजाची आठवण येतेय.
होय आज खरंच या किळसवाण्या राजकारण्यांची चिड येतेय, आमच्या राजांचा फक्त राजकारणापुरता वापर केला यांनी, पण त्यांचे विचार मात्र विसरले. म्हणूनच कि काय हिंदू असो वा मुस्लिम आज साऱ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राज्यकर्त्यांची उणीव भासतेय.
