मुंबई : राज्य सरकारच्या सरकारी नोकर भरतीचा आकडा बघून तरुण भारावले खरे, पण त्यासाठी फडणवीस सरकारची ‘अट’ समजल्यास तुमचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण तुमची निवड झाली तरी तुम्हाला तब्बल ५ वर्ष शिक्षण सेवकाच्या धर्तीवर केवळ मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर सुद्धा कायम स्वरूपाची खात्री नसेल, कारण त्यानंतर सुद्धा तुमची पात्रता व कामगिरी बघूनच ती नोकरी नियमित केली जाईल.
राज्य सरकारने येत्या २ वर्षात एकूण ७२ हजार वेगवेगळ्या खात्यातील सरकारी पदं भरण्याची घोषणा केली. त्यातील एकूण ३६ हजार पदं पुढील वर्षी भरण्याचे लक्ष होते. परंतु सरकारची अट पाहता तरुणांचा निव्वळ हिरमोड होण्याची शक्यता अधिक आहे.
शासन निर्णयात असं म्हटलं आहे की, राज्यस्तरीय संवर्गातील पदे भरताना पदोन्नती श्रेणीतील सर्वात खालचे पद तसेच जिल्हास्तरावरील पदे ही शिक्षण सेवक, कृषी सेवक आणि ग्रामसेवकांच्या धर्तीवर नियुक्तीपासून प्रथम ५ वर्षांसाठी मानधनावर भरण्यात यावीत. त्यानंतर उमेदवारांची पात्रता आणि ५ वर्षातील कामगिरी तपासून त्यांना नियमित सरकारी वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. त्यामुळे नियुक्ती होऊन सुद्धा उमेदवाराला ५ वर्ष ‘कायमस्वरूपी नोकरी’ साठी वाट पाहावी लागणार असली तरी त्यानंतर सुद्धा ती मिळेलच याची खात्री देता येणार नाही असंच काहीस ही सरकारी अट सांगून जाते आहे.
