पालघर : शेतकऱ्यांचा ज्वलंत मागण्यांसाठी राज्याभर पुन्हां एल्गार, येत्या १ जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला सरकारने किमान २७ रुपये भाव द्यावा, या प्रमुख मागणीसाठी किसान सभा, प्रहार आणि लाख गंगा आंदोलकांनी सर्व दूध उत्पादक जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून व राज्य सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्याची हाक आज दिली आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

१ जूनच्या या आंदोलनाचा निर्णय लाखगंगा येथे संपन्न झालेल्या ग्रामसभेत आमदार बच्चू कडू, डॉ. अजित नवले आणि धनंजय धोरडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि सरकारकडून शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी देणारा कायदा करा अशा विविध मागण्यांसाठी किसान सभा १ जूनला राज्यभरातील तहसील कार्यालयांना घेराव घालत आंदोलन करणार आहे.

किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी.गावित, किसन गुजर आदींच्या उपस्थितीत राज्य कौन्सिलची बैठकीत संपन्न झाली तेव्हा हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra farmers to start agitation from 1st june again in whole state