मुंबई : देशभरात पार पडलेल्या मतं मोजणीतून जे निकाल हाती आले आहेत, त्यामध्ये शिवसेना वगळता सर्वच पक्षांनी भाजपला पोटनिवडणुकीत मात दिली आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत राहून भाजपला केलेला विरोध आणि निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्याच पंगतीला जाऊन बसण्याची रणनीती मतदाराच्या पचनी पडत नसल्याने, पुढील निवडणूका शिवसेनेला कठीण जाऊ शकतात.

२०१४ पासून शिवसेना सत्तेत राहून भाजपला विरोध करत आहे. केंद्र आणि राज्यात १२ -१३ मंत्रिपद उपभोगून शिवसेना विकासाच्या नावाने भाजपवर टीका करत आहेत, पण त्यांचे मंत्री कोणता विकास करत आहेत याची उत्तर शिवसेनेकडे नाहीत. त्यामुळे शिवसेनेचा सत्तेत राहून विकासशुन्य कारभार सामान्य मतदाराच्या मनाला पटताना दिसत नाही.

त्यामुळेच भाजप बरोबर नसणारे सर्व पक्ष भाजप विरोधात यशस्वी होत आहेत, तर महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेना पराभूत होत आहे. भाजपने संपूर्ण ताकद पालघरमध्ये पणाला लावली असली तरी, शिवसेनेतसुद्धा पक्ष नैतृत्वापासून संपूर्ण पक्ष पालघरच्या मैदानात उतरला होता. सर्व रणनीती वापरून सुद्धा अखेर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीला जर काँग्रेसचा पाठिंबा मिळाला असता तर कदाचित शिवसेना थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली असती.

नितीशकुमारांना जशी बिहारमध्ये भाजपशी जवळीक भोवताना दिसत आहे, तसेच शिवसेना जरी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा करत असेल, तरी एकूणच २०१४ पासूनच त्यांचं राजकारण पाहिल्यास मतदार त्यांच्यावर २०१९ मध्ये किती विश्वास ठेवेल हे आता सांगणं कठीण आहे. पण हिंदुत्वाच्या नावाने मतांसाठी उत्तर भारतीय मतदारांकडे आकर्षित झालेल्या शिवसेनेकडे, जर त्यांच्या पारंपरिक मराठी मतदाराने सुद्धा पाठ फिरवली तर आगामी निवडणुका शिवसेनेसाठी फारच कठीण जाऊ शकतात. आधीच शिवसेनेचा पारंपरिक कोकणी मतदार सुद्धा नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून आणि शिवसेनेच्या दुपट्टी भूमिकेमुळे रागावला आहे हे लक्षात घ्यायला हवे.

Everyone success against BJP in by poll excluding shivsena