मुंबई : मुंबई महानगर पालिकेवर १९९७ पासून शिवसेना सतत २१ वर्ष सत्तेत आहे. परंतु मुंबईमधला केवळ मराठी माणसाचा टक्काच नाही तर शहरातील शिक्षण व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा घटक असलेल्या मराठी शाळांचा टक्का सुद्धा झपाट्याने घटत चालला आहे. परंतु याच मुंबईमध्ये हिंदी भाषिकांसाठी हिंदी भाषेच्या शाळांचे अनेक माजली इमारती महापालिका उभ्या करत आहेत आणि थाटात उदघाटन सुद्धा केली जात आहे.
मुंबईतील कुर्ला पश्चिमला काजूपाडा येथे आज ३ मजली मनपा हिंदी शाळेच भूमिपूजन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते आज पार पडत आहे. विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मतदारसंघात ही शाळा सुरु होत आहे आणि ‘उत्तर भारतीय युवा मंच’च्या नावाने निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. कदाचित मनसेमध्ये राहून ते करणं शक्य नसल्यामुळे दिलीप लांडे यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला असावा असं एकूण चित्र आहे.
मुंबई महापालिकेचा आरोग्य आणि शैक्षणिक निधी हा मराठी माणसाच्या किती कामाचा आणि अमराठी लोकांच्या किती फायद्याचा अशीच म्हणायची वेळ आली आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची मराठी बद्दलची अनास्था आणि हिंदी बद्दलची जवळीक महाराष्ट्र, मुंबई आणि मराठीला एका भयानक भविष्याकडे ओढून घेऊन जात आहे हे वास्तव डोळ्यासमोर आहे. मुंबई शहरातील आरोग्य आणि शैक्षणिक सुद्धा निधी जर हिंदीवरच खर्ची जाणार असेल आणि सर्व सोयीसुद्धा त्यांना प्राप्त होणार असतील तर हे लोंढे आहेत, त्यापेक्षाही भयानक प्रमाणात वाढतील अशी स्थिती हे प्रतिनिधी करत आहेत. हे असच वाढत राहील तर मराठीचा मुंबईतील भविष्यकाळ काय असेल हे महापालिकेच्या मराठीबद्दलच्या अनास्थेतून आजच समोर येत आहे.
आम्ही केवळ वास्तव स्वीकारत आहोत अशी प्रतिक्रिया देऊन सत्ताधारी मराठीच्या वास्तवाकडे उघडपणे डोळेझाक करत आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी स्वतःच्या मतदार संघात जितका जोर हिंदी भाषिकांच्या सोयीसुविधांसाठी पालिकेत लावतात, त्याच्या ५० टक्के जोर जर मराठी शाळांच्या वाढीसाठी लावतील तरी मुंबई आणि मराठीच भलं होईल.
मुंबईत पायाभूत सुविधा उभारताना संस्कृती आणि राज्याच्या भाषेपेक्षा, त्या वास्तू बांधताना आपले स्थायी समितीतून हितसंबंध कसे जपले जातील आणि मतांची गणित कशी आखली जातील याचीच काळजी स्थानिक प्रतिनिधींना जास्त असल्याने मुंबईमध्ये मराठी भविष्य सर्वच बाजूने ‘संकटात’ आहे असच म्हणावं लागेल.
